Friday 17 October 2014


श्वास कथा 
(उभ्या आडव्या - तिरप्या तारप्या श्वासांच्या क्षणभंगूर कथा )

श्वास कथा - १
विग  

विरळ गर्दीच्या रेस्तौरांत चेहऱ्यावर हसू थापून बसलेली ती…. शेजारच्या खुर्चीवर. ही तीच आहे नं ? केस वाऱ्यावर भुरभुरताहेत, पण त्यानं ओळखलं, हा विग दिसतोय हिच्या डोक्यावर. हिचे केस असे थोटके, काळे -कुरळे नव्हतेच हा कधी. जरा बेताचे लांब, पांढरट करड्या छटेचे… कधीतरी मायेनं हात फिरवावा असे वाटण्याजोगे …काय हे ? त्याला राग आला ! पण तो असा फसला जाणारा नव्हता … त्याला एकाएकी तिला पहावंसं वाटेना.  

बराच वेळ शांतता. ती शांत… अपेक्षेपार खुर्चीत खोचलेली. दोघांतली शांतता पीत. त्यात काय, कितीक नवरा बायको, मित्र - मैत्रिणी  रेस्तौरांमध्ये असे बसतात की… माठ शांतपणे. आपल्याला इथं कुणाला काही विचारायचं नाईये .  "आमटी वाढू का? भाजी ? ठीक झालीय का? एखादी पोळी घ्या की अजून" !!! आपण आणि आपलं ताट. 

समोर दोन खुर्च्या. रिकाम्या. रिकाम्या सावल्यांच्या. झाडं हात सोडून बसलेली. दूर दूर एखाद दुसरं माणूस हलतंय. कुणीसं इथं आपल्यात येऊन बसलं तर? त्याला विचारानं सुखद वाटलं. 

मधेच शांततेनं शांतता पेटावी तसा तो तिच्याकडे वळला .

"विग घातलायस नं ? कायतरीच करतेस! " त्यानं नाक मुरडून श्वास सोडला मोठा. जसं आहे तसं न दाखवण्याचं फॅड सगळं हिचं सालं… 

ती फिसफिस हसली.  नेहमीचंच. टिंगलखोर!

तो पहात राहिला, 'दात पण दुसरे लावून आलीये बया' ! चार सुळे त्यानी ओळखलेच लगेच!

"घरातल्या मांजरीचे दात लावून आलीयेस ना, how disgusting!" त्यानं मणभर तिरस्कार ओतला तिच्यावर.  

"नाई हो, कायतरीच तुमचं" परत टोचरी मिश्किलता… "आणि तसंही दूध प्यायला दात कशाला लागतात मांजरांना ?" पुन्हा फिसफिस … चार सुळे टिकटिकले.

त्यानं मान वळवून टाकली. आता तो आणि त्याचा ग्लास. बास !!! ती तशीच हसू माखून. विग आणि जास्तीच्या चार दातांसकट. हिच्यातून काय उपसून काढावं म्हणजे जरा निभावू शकू हिच्याबरोबर अजून थोडा काळ ! याच्याभोवती बधिर थकवा. 

एवढ्यात समोर मित्र.  आता तो खुलला. दोघां मित्रांनी प्रेमात असल्यागत एकमेकांना जवळ ओढलं. मगाशी पाहून न पाहिल्यासारखं केलं होतं  तरी आत्ता ते जीवाभावाचे दिसत होते. 

"ही मैत्रीण माझी" त्यानं मित्राला सांगितलं. तिनं नमस्कार केला. "हा पण जुना मित्रय माझा" ती मित्राकडे पाहून हळूच नाजूक हसली, मान लववून. दात न दाखवता.  

" आणि ही माझी फ्रेंड… गर्ल फ्रेंड नाही हा"…नुसती फ्रेंड ….  हैं हैं हैं …हैं हैं हैं "

स्वतःच्या शब्दांनी त्याला एकाएकी विलक्षण तरतरी आली, शरीर विजयी वाटू लागलं. तो आतून डोलू लागला. 

तिचा चेहरा बिकटला. अनियंत्रित वेडावाकडा होत चौकटी मोडून फुटला. विग विरघळून पायाखाली कोसळला. जास्तीचे चार दात गळून पडले. नजर संपल्यासारखी ती मित्रांमधून दिसणाऱ्या अवकाशाच्या तुकड्याकडे पाहू लागली. 

"पण….  ही पण जुनीच हा, खूप जुनी मैत्रीण माझी "… तो पुटपुटला. मित्र अजून काहीबाही बोलू लागला. 

नंतर काही क्षणांनी त्यानं पाहिलं, ती तिची सावली खुर्चीत सोडून रेस्तौराबाहेर पडत होती. 

Wednesday 17 September 2014


13.09.2014



 ताव्वा,

कधीतरी तुला हे सांगायचं होतं…. 

मध्यरात्रीच्या बेछूट अंधारात…. 
नगरातल्या रस्त्यांवर धावताना…. 
मागे वळून पाहीलं तेव्हा…  रोजच दिसले तुझे डोळे दिवा बनताना.

पहाटेला पाण्याच्या बादल्या वाहतांना…
कुंच्यानं फरारा अंगण झाडताना… 
अदबीनं माळेत तुटकी फुलं ओवताना… 
दिसले होते तुझे डोळे धीरबिंदू वाहताना… 

कधी तुला हे सांगायचं होतं…. 

पाय मुडपून ताटाभोवती गोल करून बसताना…. 
लोणच्याच्या कोरड्या खाराला चतकोर लावून खाताना.....
तुझ्या स्निग्धतेनं पाठीच्या उपड्या कमानी पुन्हा ताठ होत राहिल्या… 
तेव्हाही दिसले तुझे डोळे पुन्हा पुन्हा 'आई' बनताना…. 

आजही अशीच तू…. 
 
खोल्यांमधून निथळंणाऱ्या …. 
भिंती कोपऱ्यातून साठणाऱ्या … . 
बेबंद कड्यांना जोडणाऱ्या….  त्याच रोवलेल्या हास्यासह….

हे सारं असंच असू दे 
तुझा पारा या आरशांमागे उरू दे…. 

कधीतरी एवढं…. एवढंच तुला मागायचं होतं…. 

Saturday 7 June 2014


ते वीजेचं पोर

सन २०११ - 

ऊ… ऊ  …ऊ … असा विचित्र  बारीक आवाज ऐकून मी घराचं दार उघडलंय. बाहेर एक मजेदार रंगाची मुठीत मावेल एवढी माऊ मनातल्या मनात ओरडतेय. मी आणि पायस 'पूर्णवेळ माऊप्रेमी'. लगेच झडप घालून तिला घरात आणलंय. 

" ई… कसलं पिवळबेंद्रं  मांजर आहे !!" इति विजय…  'अर्धवेळ माऊप्रेमी'.
"विजू, ही म्याऊ आहे, मांजर काय  म्हणतोयस ? आणि पिवळबेंद्रं ? !" माझा तीव्र नाराजीचा कटाक्ष. 

ही देसाई काकूंच्या पेनीची पहिली भेट ! काळसर ढगांच्या गर्दीत पिवळसर सूर्य लांब चेहरा करून पडून राहावा, तसा तिच्या काळया करड्या नाकावर एक पिवळट पट्टा सुस्तावल्यासारखा पडून आहे. तिचं अवघं रूप त्यामुळे मजेदार झालंय. तिच्या शरीराचा सगळा ताल आणि तोल तो सूर्याचा पट्टा सांभाळतो. कधी पेनीचा चेहरा उग्र दाखवायचा, कधी नरम, कधी अमाप आश्चर्य उधळायचं, कधी कुणाला उगाचच घाबरवायचं हे सगळं तो 'सूर्य-पट्टा' ठरवत असणार, अशी आमची खात्री आहे. तेच तिचं प्राथमिक हत्यार असावं . त्याशिवाय का ही घाबरगुंडी माऊ उगाच इकडे तिकडे रुबाबात फिरते पोराबाळांना धमकावत ? 

पेनी एकूणच सूर्याच्या घराण्यातली असावी. दिसतेय मवाळ म्हणून मायेनं जवळ जावं, तर क्षणात तिची  नजर जळजळेल, जर्द पिवळी बुबुळं नापसंतीनं नजरबंदी करतील आणि विचकलेले दात जन्माची भीती घालतील. लांबून काही बोललात तर "ऊ …. ऊ …." अशा प्रतिसादानं गप्पा सुरु होतील, मग त्या कितीही वेळ चालू दया, प्रोब्लेम नाही. लहानपणी गाडीखाली येउन मरता मरता देसाई काकूंच्या नातवानं, अमेयनं वाचवून ओंजळीत उचलून आणलेलं हे चिमुटभर पिल्लू…आता जमेल तेवढी माया सर्वांकडून गोळा करीत पेनीचा हा उग्र काळपट - वेडपट गड्डा भराभरा वाढतोय.  

सन २०१२ - 

याच्या त्याच्या घरात जात-येत डहाणूकर कॉलनीत पेनीनं झक्क जम बसवलाय. अलीकडच्या पलीकडच्या सोसायटीतल्या अनेक घरांमध्ये तिनं आपल्या संयत वागण्यानं घरोंदा निर्माण केलाय. "लिमिटेड प्रेम" कॅटगरीतली असल्यामुळे ती तशी स्वतःहून कुणाच्या अंगसटीस जाण्यार्यातली नाहीच . आपणहून जवळ आली तर भाग्य उजाडलं ! पण गम्मत म्हणजे कधीकाळी सोसायटीतल्या मोठ्या माणसांनी जिच्याविरुद्ध बंड पुकारत एकमेकांत भांडणं केली होती , ती सगळी आता तिची चाहती आहेत. तिच्या असण्यानं सर्वांना मूक सोबत मिळालीये. 

पेनी आता निवांत फिरते सर्वत्र. तिची काळजी नाही वाटत कुणाला. सतत संयत - सावध, विचारशील चाल आणि तीक्ष्ण कान यामुळे धोके कमी झालेत तिच्यापुढ्चे. मुलांबाळांकडून तिला "झेड कॅटेगरी" सुरक्षा पुरवली जातेय !  

सन २०१२ - १३

पेनीचा गृहपाठ लहानपणापासूनच पक्का आहे. संथ चालत आधी कुणाकडं जायचं , कुणाकडं जाऊन नक्की काय काय करायचंय याबाबतचा गोंधळ तिला खपत नाई . सकाळी देसाई काकूंकडे कॅट फूड आणि दूध प्यायचं , मग दुपारची झोप माझ्याकडे , मध्ये जाऊन वर्षाकडे दूध पोळी खायची, रात्री माझ्याकडे अंडी आणि मांसाहार ! रात्रीची झोप देसाई काकू किंवा वर्षाच्या घरात ! या पलीकडे पेनी कुणाकडे जाऊन काही मागेल असं नाही. मात्र दिवसभरात एकदा तरी ४-५ तासाची घट्ट झोप हवीच माझ्या घरात. पायस जिथे अभ्यास करतो तिथंच तिनं पलंगावर स्वतःला पसरलंय, जागा कमी पडली तर पायसच्या पायाला चावून तिनं जागा वाढवून घेतलीये आणि आता  अभ्यास गुंडाळून पायसही पसरलाय ऐसपैस. 

पेनीच्या प्रेमात पडणार्यांची संख्या दिवसेगणिक वाढतेय। 'अर्धवेळ माऊप्रेमी' विजयला घरात आल्याआल्या पेनीला पाहायचं असतं. 'मानसिक गुंतण्याचा त्रास होतो म्हणून प्राण्यांवर जीव जडू न देणारे वर्षाचे कुटुंबीय आता पेनीपुढे हार मानून तिच्या प्रेमात पडलेत. देसाई काका - काकू, त्यांची मुलगी, नातवंडे पेनीच्या वेळी अवेळी येण्यामुळे होणारी गैरसोय खुशीनं सांभाळून घेत आहेत. निनाद, धनू, इरा पेनीला पाहण्यासाठी येता जाता येउन जातात. माझ्या बहिणी, त्यांची पोरं मला भेटण्याचं निमित्त करून पेनीशी खेळायला धावत आहेत.         
 
लेकिन कुछ दिन से हमारी पेनी के तेवर कुछ बदले बदले से लग रहें हैं !! ती एका देखण्या, सुंदर फर असलेल्या बोक्याला वश झालीये. सोसायटीत कुजबुज सुरु आहे. डोळ्यांसमोर आकार घेणारी ही नवीन फ्रेश प्रेमकहाणी पाहून अंमळ अवाक झालेली सोसायटीतली पोरंबाळं मला येउन म्हणतात, "'हे काय पेनीचं वय आहे असंलं वागण्याचं ? ती आमच्याशी आता खेळतच नाहीये."  त्यांचा राग योग्य आहे. फक्त दोन वर्षांची त्यांची टॉमबॉय पेनी… कुणाला कधी भीक नं घालणारी, तुसडी, मारकुटी पेनी खुशाल आता दिवस दिवस त्या बोक्याच्या मागे जातेय ! कधी त्याला टाळतेय तर कधी कवटाळतेय ! "हमारी पेनी…हम ही से म्याव ?" 
 . 
सन २०१३ -

पेनीची सावध - संयत चाल आता अधिकच सावध-संथ-संयत झालीये. तिची तकाकी, डोळ्यातलं तेज मोठं मोहक दिसतंय. अंग भरलंय. ती गुब्री दिसू लागलीये, तिची भूक वाढलीये. "बाईसाहेब प्रेग्नंट दिसताहेत"… बायापुरुशात कुजबुज आहे. पेनीच्या कौतुकाला उधाण आलंय… 

आता पेनीची लगबग वाढलीये. ती सतत कपाटे,खोकी, मोकळ्या जागा , माळ्यावरच्या अंधाऱ्या जागा विस्कटतेय. खूप शोधाशोध करून, बारकाईनं अभ्यास करून बाळंत होण्यासाठी तिनं वर्षाचं घर मुकरर केलंय. वर्षाचे अप्पा , आई , भाऊ मनीष सगळे खुश झालेत. सगळ्यांनी तिच्या गरजांनुसार आपल्या कामकाजाच्या वेळा बदलल्या आहेत. देसाई काकूंनी तिच्यासाठी पौष्टिक खाऊचा खुराक स्वतःच्या हातांनी तयार केलाय. तिचं वेळी अवेळी येणं जाणं ,खाणं- पिणं सर्व आता सर्वांच्या देखरेखीखाली वेळापत्रकानुसार होतंय.  

५ जुलै २०१३ - 

दिवसभर देसाई काकू, वर्षा आणि इतरांकडून भरपूर सेवा करवून घेत पेनीबाई एकदाच्या संध्याकाळी बाळंत झाल्यात. पेनीचं बाळ पाहून तर रडूच आलंय सगळ्यांना. मांजराचं पोर डोळे दीपावं इतकं देखणं असू शकतं ? सायीसारखं गुलाबी शरीर, गवताच्या पात्यासारखे पातळ गुलाबी पाय, दाण्याइतके चिमुकले पंजे  आणि अंगावर काळपट राखाडी बुंदक्यांची रेशमी मखमल ….आनंदानं आम्ही सर्व वेडे झालोत. प्रत्येकानं दोघांसाठी दीर्घ आणि सुंदर आयुष्याची प्रार्थना केली आहे   पाण्यानं भरलेल्या असंख्य डोळ्यांनी बाळाची दृष्ट काढली आहे…टायगर…आमचा टायगर… वाघाचे बछडे जन्माला आलेय. संत्र्याची बर्फी वाटून जन्माचा सोहळा साजरा होतोय … 

ऑगस्ट - डिसेंबर २०१३ -

तेजतर्रार बदामी डोळ्यांचा गुब्रा गुब्रा टायगर अक्षरशः नाकात दम आणतोय सर्वांच्या. 
कसे सांभाळावे या दांडग्या वाघाला ?

"हे पोर म्हणजे अखंड उच्छाद आहे बाबा "
"अरे हा इथे ओट्यावर चढलाय ! झालं …पाडली भांडी सगळी "
"टायगर… अरे गधड्या, नको फ्रिजवर चढूस " 
"ए अरे बाळा, सोड पेनीचा कान… नको गळा पकडू तिचा, मरेल न ती" 
"आस्स …खा मार आता पेनीचा, तुला असाच मार पाहिजे म्हणजे सुधारशील जरा"

टायगर काही सुधारण्याचं नाव नाही. हा पोरगा अंगात वारा घेऊन आलाय का ? दिवसभर सोसायटीतल्या कुठल्या मजल्यावर, कुठल्या घरात हा असेल सांगता येत नाही. कुणाला तो वर्षाकडे खाताना दिसेल तर दुसऱ्या क्षणी पार्किंग मध्ये पेनीच्या अंगावर धाड धाड उड्या  मारताना दिसेल. क्षणात जिन्यांच्या भिंतींवरून घसरत खाली येईल तर पुढच्या क्षणी कुणाच्या गाडीचे सीट फाडायला बसलेला दिसेल. घरातल्या दोऱ्या, कुंचे, टरफले, गोळ्यांची पाकिटे, बाहुल्या, चपला, कागद, कपडे …. काही काहीच सुटणार नाही याच्या तावडीतून. कधी आपण हात हालवला म्हणून हात पकडेल तर कधी हात का नाही हालवला म्हणून शंकेनं  उडी घेईल हातावर. रात्री कुठेतरी कुणा मांजराला चोपाचोपी करेल, तर कधी पेनीबरोबर वर्षाच्या गाडीची वाट पाहत रात्री रस्त्यात लोळण घेईल.  पण एक आहे, तो तोडफोड नाही करणार कधी, नुसता अमाप खेळेल त्या गोष्टीशी , नासाडी नाही करणार. काहीच मनोरंजक नसेल तेव्हा हे साहेब भिंतीवरचे डाग पकडण्यासाठी सहा सहा फूट उंच उड्या मारत बसलेले दिसतील. 

सर्वांकडे टायगर साठी कॅट फूड, अंडी, मासे, चिकन तयार असणारच. कारण हा पोरगा कधी काय मागेल याचा भरवसा नाही आणि ते मिळेपर्यंत असा गळा काढून रडेल, ओरडेल की घराघरातून "टायगर का ओरडतोय पहा रे जरा " असे हाकारे सुरु ! परवा रात्री इतका उंच झाडावर जाऊन बसला की उतरवता उतरवता आमची दमछाक. रोज वर्षाच्या घरात हा वारं प्यायलासारखा हुन्दड्तो, हव्या त्याच शालीत गुरफटून बसतो, आई अप्पा त्याचे पाय दाबून देतात. त्याला झोप नाही आली तर रात्री मनीष त्याला खांद्यावर टाकून फिरत थापटून झोपवतो तीन तीन तास.  देसाई काकूंकडे झोपाळ्यावर गालीचा घेऊन ठराविक जागीच तो झोपतो.

माझ्या घरात मासे खाताना त्याची उडणारी धांदल पाहणे म्हणजे "याची कानी याची डोळा " असा विलक्षण सोहळा आहे. मासे पाहून हा इतका उल्हसित आणि उत्तेजित होतो की तोंडातून "नम नम नम नम नम नम नम नम " असे मजेशीर आवाज काढत, उडत बागडत लवलवत मासे फस्त होतात. हे "टायगरचे मस्य-स्तोत्र" ! हा एक इतका आनंददायी आणि देखणा आविष्कार असतो की माशांनाही त्याच्या तोंडी जाताना सार्थक वाटावे ! अर्थात स्वतःचे मासे खाऊन त्वरित पेनीच्या पुढची थाळी ओढून ती देखील साफ करणं तो विसरत नाही. पेनी हताशपणे युध्द हारत दूर बसून राहते. 

सध्या आम्ही सगळे त्याच्या उनाड मस्तीत इतके बुडालेलो आहोत की दिवसाचे २४ तास अपुरे पडताहेत. वर्षाला टायगर दिसला नाही तर काही सुचत नाही. तिचे त्याच्याशी सतत संवाद चालतात. भांडणे सुद्धा. टायगर बद्दलचे तिचे निष्कर्ष मोठे मजेदार आहेत. ती म्हणते, टायगर तिला माणूस नाही, मांजरच समजतो. तो तिच्याशी खूप बोलतो !! मात्र टायगर दिसला नाही तर सगळे सैरभैर होतात आणि त्याला रात्री अपरात्री देखील शोधून घरात आणतात. त्याच्या मागे मागे करण्यात, त्याला खेळवण्यात, खाऊ घालण्यात अपार आनंद आहे. वर्षाचे आई, अप्पा, देसाई काका, काकू सगळ्यांचेच ब्लड प्रेशर आता अचूक कोपऱ्यात बसलेत. 

टायगर आता अगदी मस्तवाल रांगडा गडी झालाय. रोज मस्त दमदमून खाणे, मासे चिकन ओरपणे, कधी खवा, मलई मटकावणे, दिवस दिवस उद्दामपणे रेटून खेळणे, मनसोक्त उड्या मारणे या रोजच्या प्रोग्राम मुळे टायगर इतका तकतकीत आणि धष्टपुष्ट झालाय की त्याच्यावर नजर ठरत नाही, कोणाची बिशाद आहे त्याला हात लावण्याची ? मात्र रोज त्याच्यावरून दृष्ट ओवाळून टाकण्यात वर्षाची आई आणि देसाई काकू चुकत नाहीत.
 
जानेवारी २०१४ - 

पेनी धावत ओरडत माझ्या नव्या घरात आली आहे. का आली गं बाळा अशी किंचाळत ? काय झालं ? काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. तेवढ्यात वर्षाचा फोन. टायगरला ट्रान्सफ़ोर्मर चा प्रचंड धक्का बसलाय. अरे देवा !! सगळे हॉस्पिटलमध्ये, त्याला ताबडतोब उपचार दिले जाताहेत, इंजेक्शन , सलाईन, औषधे. तो सपाट पडलाय, डोळे बंद आहेत , खूप धाप लागलेल्या अवस्थेत वर्षाला चिकटून बसलेला टायगर अक्षरशः फडफडतोय, छातीत श्वास मावत नाहीये. हा आपला टायगर ? हाच तो? त्याचा मानबिंदू असलेली त्याची रेशिमकांती… कुठे गेली ती कांती ? हे … हे … जळलेले, फाटलेले, विस्कटलेले , काळवंडलेले केस… कुणाचे ग? हे प्राणहीन मिटलेले डोळे… कुणाचे? टायगरचे? आणि त्याचा तो भसाडा आवाज कुठाय? गेला ? कुठे? अगं काय झालं ग हे ? उठ रे बाळा . ओरड जरा. खूप ओरड, रड, त्रास दे, उड्या मार , नासधूस कर हवी तेवढी… पण … पण गप्प बसू नकोस असा… दोन दिवस असाच मूक आहेस तर दोन दिवस तपासारखे झालेत, काल सरपटत एकेकाच्या कुशीत जाऊन झोपून आलास ना… शाना बेटा आमचा … बाहुली घे तुझी ही आवडती. ठेव जवळ. आता बरा होशील हां बाळा उद्यापर्यंत. विश्वास ठेव . का असा केविलवाणा पहातोयस ? का ही आसवं ? काय सांगायचंय ? घशात आवाज का अडकतोय ? ही उचकी…. हे आचके ? टायगर सगळ्यांकडे पहा बेटा, बघ सगळे आहेत जवळ तुझ्या…डोळे उघड… उघड ते तेज, पाहू दे एकदा तुझी ती वाघाची नजर ! नको दूर जाऊस… नको जाऊस टायगर … आमच्या लाडक्या बाळा…. 

तो शांत. शांतच. तुफानी शक्तीचं, वाऱ्याच्या लहरीच ते पोर थंड जमिनीवर मान मुडपून हातपाय जोडून झोपी गेलंय. सगळ्या प्रार्थनांच्या, विनवण्यांच्या पलीकडे. 

वीजेचंच पोर  …. आज वीज त्याला आपल्या घरी घेऊन गेली. 

Saturday 19 April 2014


गाडीच्या पायांनी वळणावळणांचा घाट कोरुन घेतलाय. ती पाय ठेवतेय तिथे तिथे धुक्याची रुमझुम. 

कास पर्यंत पोहोचू एवढ्यातच, पण तोवर हा हिरवा रस्ता कसा पार करावा ! 

इतक्या स्वच्छ हवेत श्वास कोंडताहेत . सेकंदा सेकंदाला सभोवतालातून अंगावर येणारा हिरवेपणा. तापच आहे च्यायला. तेच हिरवं क्रूर संगीत ! कोण कुठल्या मनःस्थितीत आहे, नाही कुणाला काय त्याचं ! मेंदूशी सारखी एकच सळसळती कुरकुर…  कुरकुर…  कुरकुर…  कुरकुर… 

कधी कधी इच्छा असो नसो, पोपटी झिलमिलती झाडं पहावीच लागतात. डोळ्याआड कशी टाकावी?. 

कशासाठी यांची एवढी वल्वल ? शांत बसावं जरा , झोपा म्हणावं पहाटेचं निवांत!  

मला गाडी चालवू द्या , शांततेनं. ही वाट पार करू द्यात. त्याच्या घरावरून पार होऊ द्या    

Tuesday 8 April 2014

झिनी झिनी बीनी चदरिया


झिनी झिनी बीनी चदरिया 

'अदभुत' शब्दाचा पसारा जसा व्यापक आहे, तशीच त्याची 'अदभुतता ' ही सर्वस्पर्शी आहे. कमी अधिक प्रमाणात ती प्रत्येकाच्याच जगण्यात रुजलेली आहे. पण 'अदभुततेची अस्सल आंतरिक ओळख व्हावी' असे भाग्यक्षण मात्र फार दुर्मिळ ! 'अदभुततेनं आपण सतत वेढलेले आहोत' याचं सजग भान कुठल्याशा क्षणी लखलखत समोर येउन उभं राहात आणि आपण केवळ थक्क होऊन पाहत राहतो . ही 'थक्कावस्था ' कुणाच्या आयुष्यात कुठे, कधी, कशी सामोरी येईल कुणास ठाऊक, पण एवढं खरंय की, अशा 'अदभुत ' गोष्टीं आयुष्यात याव्यात, याची स्वप्नं दिनरात पाहिली जातात. रोजच्या धकाधकीच्या जगण्याआड या स्वप्नांना मोठ्या निगुतीनं  जपलं जातं, त्यांची वाट पाहिली जाते. 

काहीतरी 'अदभुत' घडावं, पाहावं, जाणावं, भोगावं ही जीवघेणी आस…  कशासाठी? रोजच्या ' तोचतोपणाचा' दाह पेलावा म्हणून ? फक्त ? अदभुततेपायी होणारी जीवाची तलखी, तिच्या सहवासात झरझरणारी मेंदूची तरतरी काय काय अधोरेखित करते? मेंदूच्या कवाडांमागचे  हे रासायनिक पिंगे ! ते खेळता खेळता ' अदभुततेचा ध्यास' कित्येक जीवांना ' सदेही भूत' बनवतो. आपल्याला नेमकं काय हवं आहे, काय शोधायचं  आहे हे गवसेपर्यन्त कधी आयुष्याचा श्वास निखळतो, तर कधी हीच अदभुतं  जगण्याकडे पुन्हा पुन्हा वळवतात आपल्याला, अदभुताला जाणून घेण्याचं अनिवार आकर्षण आयुष्याचा केंद्रबिंदू ठरतं. 

या आकर्षणाने मला देखील माझ्या अगदी लहानपणापासून वेढलेलं आहे. आठ / नऊ वर्षांची असताना बाबांनी माझ्यासाठी आणलेली शंकराची एक निळीभोर मूर्ती… जिनं माझ्या त्या अधमुऱ्या आयुष्यावर अक्षरशः राज्य केलं. दिवसरात्र ती माझ्यासमोर उभी असायची. मी तिच्या आसपास… तिच्या निळ्या काळ्या डोळ्यात पाहायचं, भाषा शोधायची, विश्वाची गुपितं मागायची, गाॄहाणी सांगायची, खेळ मांडायचे. सगळं शंकरासाठी, त्याच्या साक्षीनं… 'सृष्टीतल्या कुठल्या कुठल्या अजब गोष्टींबद्दल मला तो सांगायचा. त्याने मला सृष्टी दाखवावी म्हणून मी हातपाय झाडून रडायचे . पण त्यानं कुठलेच चमत्कार मला दाखवले नाहीत . मग मात्र  'हा सर्वांच्या नकळत काहीतरी चमत्कार करीत असणार ' अशी माझी पक्की धारणा होत गेली.  तो  मात्र 'नाही' म्हणायचा. 

हळूहळू हे 'शंकरी' झपाटलेपण इतकं वाढत गेलं की त्याचा क्षणाचा विरह सहन होईना.शाळेत चैन पडेना.त्याच्यापासून दूर जाववेना.  हळूहळू मी शंकराच्या मूर्तीतच  शिरून बसायला शिकले. डोळे मिटायचे, शंकराला स्पर्श करायचा आणि त्याच्यासारखं थंड , अचेतन बनून त्याच्या मूर्तीत शिरायचं. फार गूढ, थंडगार आणि सुन्न अवस्था असावी ती. आसपासची गजबज शांत होत जायची, कानात किर्रर्र्र दडे बसायचे…आणि पाण्यात डोके दाबून धरल्यावर व्हावी तशी श्वासाची मरणप्राय तडफड… बस्स… हळूहळू मी त्या नीलमूर्तीत जखडले जायचे. मूर्तीतून घराच्या भिंती, कोपरे दिसायचे. माणसांचे पाय, त्याचं चालणं, थांबणं, बसणं, कचरा, गुंतवळं , केळीची सालं, झुरळं, कुत्र्याची पिल्लं, कुंचे, कपड्यांचे बोळे…आता दिवसातून कितीही वेळा मी अशी ये जा करू लागले होते त्या मूर्तीतून. खूप शांत वाटायचं , पण या कायाबदलाचा कठोर ताण यायचा माझ्यावर …थकून जायचे, पण सुटका नव्हती या ताणापासून. त्याची आणि माझीही. 

वय वाढत गेलं तसं वेडही ! रात्रीच्या गडद अंधारात आता मला शंकराचा तिसरा डोळा दिसू लागला होता. झोप उडाली. कपाळावर चिरेसारखा उभट डोळा. पापण्या नाहीत, बुब्बुळ नाही.  'तो तिसरा डोळा उघडावा' म्हणून आता माझ्या विनवण्या सुरु झाल्या. शंकराला हाका घालणं, रडणं-भेकणं, धमक्या.  तो बिचारा कुठल्या जन्मीचं  ऋण फेडत होता कुणास ठाऊक. रात्रंदिवस तोच पिच्छा.  अखेर हळूहळू शंकराच्या तिसऱ्यां डोळ्याची चीर जागी झाल्यासारखी भासू लागली. दार किलकिलू लागलं. 'त्या' जगातला विस्तव धुगघुगु लागला. आता डोळा अचेतन नव्हता. तो उघडणार होता. काहीतरी घडणार होतं, खूप काही घडणार होतं आणि ते फक्त माझ्यासाठी होतं. कदाचित सगळं बेचिराख होणार होतं किंवा काहीतरी नवीन जन्म घेणार होतं.  अदभुताची स्वप्नं आता पापण्यांवरून सत्याच्या उंबऱ्यावर उतरु पाहात होती… माझा लहानगा जीव पिसासारखा लवलवत होता. सुखानं उफाळत होता आणि एक दिवस काहीही न घडवता शंकर फुटून गेला. तुकड्यात पांगला. स्वप्न आटोपलं. मी संपून गेले. नंतर दिवसरात्र उरलेच नाहीत. फक्त काळ सरकत होता या दारापासून त्या दारापर्यंत. 
 
मनावर खरखरीत मोहाचा ओरखडा घेऊन मी बाजारातून फिरून आले. अनेक शंकर तपासले, हाका घातल्या, तो नाही मिळाला. 

अदभुताचा हात हातातून असा अकाली सुटून गेला. भेदरले मी. कुणासमोर जाववेना, कुणी डोळ्यासमोर पाहवेना. इतर अदभुत गोष्टींमध्ये रमून पाहिलं. दर आठवड्याला "टिंग - टिंग " टिमकी वाजवत येणारा डब्याचा सिनेमा, रेडीओ, मोहिंदर अमरनाथचे फोटो, "शिहू " नावाचा भाभीकडचा बोकड, "महाराजा " नावाचा माझा लाडका पतंग (ज्यानं कधीही न कट्ण्याचं वचन मला दिलं होतं) आणि चोरून घेतलेले रमचे घुटके … सगळ्याच गोष्टी अदभुत होत्या, पण त्या कशात शंकराची अदभुतता नव्हतीच. झाडावरच्या पानासारखं सर्वांत असून एकटं जगणं सुरु झालं. 

कालांतरानं शंकर विस्मरणात गेला. त्याच्या निळाईसह प्रेमात पडल्यावर जाणवलं की 'अदभुतता' आणि 'प्रेमाचा' गहिरा गूढ संबंध आहे ! एक गैरहजर असेल तर दुसरं त्याची जागा घेतं, दोघांच्या वाटची भिक्षा मागतं आणि माणसाचं पोट भरवतं. 

२००१ साली आईला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आणि त्यानंतर तिचे उपचार, चाचण्या, केमो यांच्या माऱ्याखाली आम्ही चारी भावंडे झोडपली गेलो. दहा महिन्यांचा वेदनाकाळ. आई सगळ्या त्रासातूनही निखळ हसर्या गप्पा मारायची. ती स्वतः  गायिका आणि माझे वडील उत्तम तबला वादक होते . तिचं माहेर इंदोर - देवासचं. तिथल्या आठवणी, माणसं, तिचं गाणं , तिची शाळा, बालपण, भावंडं . डोळे भरून यायचे तिचे सांगताना ! देवासचं.कुमार गंधर्वांचं घर, त्यांचं गाणं , मैफली, त्यांचं  आजारपण…भरभरून बोलायची ती. कुमार तिचे मानलेले गुरु होते.  तिच्या आणि आमच्या सगळ्या घराला संगीताचा कान होता. मी मात्र लहानपणापासून शास्त्रीय संगीतापासून स्वतःला दूर ठेवले होते. काही विसंवाद होते. परिणामी माझी स्वरांची समज शून्यवत आहे. 

पण आईच्या आजारपणात मात्र विकल झालेल्या माझ्या श्वासकड्यांत  आईनं कळत नकळत 'कुमार ' नावाचा एक मुक्त निर्मळ स्वर गुंफून टाकला…तिच्या कुमारांबद्दलच्या गप्पांनी, गाण्याच्या स्पर्शानी मी बांधले गेले आणि…आता खरा धसका बसला ! या गाण्याकडे तर मी केव्हाच पाठ फिरवली होती न ! एवढी वर्षे जे गमवत राहिले ते गाणं आता नेटानं समोर उभं होतं. किती काळ गेला, किती आनंद गेले , स्वर साधकांच्या मैफली प्रत्यक्ष ऐकण्याच्या कितीक संधी गमावल्या ? काहीच कसे शिकलो नाही आपण ? आता ही ठसठसती मूक व्यथा माझ्या पदराला बांधून आई निघून गेलीये.  

संगीतानं हात हाती घेतलाय, पण कुठून काय ऐकावं, काय समजून घ्यावं ? कसं ? कशी ही वाट चालावी ? तडफड होतेय. आईनं कळत - नकळत कुमारांची वही माझ्यावरून उतरवलेलीये, तोच निर्मल आवाज इथे झुळझुळतोय ! मित्रानं दिलेलं कुमारांचं गाण्याचं भांडार… मी फक्त ऐकते आहे … एक पाचूचं  झळाळतं बेट माझ्या गुणसूत्रांत नांदू लागलंय, हिरव्या रस्त्यांचं, पोपटी दारांचं, आणि त्या दारांमागे उभीये ती… निळी अदभुतता… 

"सूझत नाहिं गान बिन मम कछु 
जानत तूहि सब जन नाहिं … !!"

गाण्याशिवाय दुसरं काहीही न सुचण्याची ही अवस्था तुझ्याशिवाय इतर कोण जाणू शकणार ! तूच तर जाणतोस सारं, तुझेच स्वर माझ्याबरोबर चालत आहेत !

मी रोज काही न काही ऐकत आहे… आसपास पाहत आहे… आसपासची दुनिया कुमारांची दिवाणी आहे . त्यांच्या बंदिशी, कबीर भजनं, 'गीत वर्षा, गीत हेमंत, ऋतुराज, त्रिवेणी , टप्पा ठुमरी, तांबे गीत' असे लकाकणारे अनोखे कार्यक्रम…. अथक , अजोड निर्मिती ! नवोन्मेषाची गाठोडी वाहून नेणारे ते स्वर आणि त्या स्वरतांड्यांना अपूर्व ताकदीनं हाकणारा हा अवलिया ! 

आता जुने निग्रह झोडपले गेलेत. सगळे कमकुवत दोर कापले गेलेत. स्वरांनी मला त्यांच्या कुशीत घेतलंय. ते माझ्याबरोबर चालतात, मला पडू देतात, उचलतात, स्वैपाक करताना ओट्यावर चढून गप्पा मारतात, गाडीपाशी माझी वाट पाहतात, मंडईत माझ्या डोळ्यांनी भाज्यांचा हिरवा प्रकाश पितात… आता मी जाणू शकतेय त्यांची व्याप्ती, त्यांची माया… हृदयातलं बोलू शकतेय त्यांच्याशी… सगळे मोसम आता आनंदी शांततेचे आहेत, आसपास स्तब्ध श्वास असण्याचे !

कदाचित हीच आहे का ती वेळ…. पाऊल न वाजवता स्वतःकडे निःस्तब्ध परतण्याची ? हीच आहे का ती वेळ …. गुणसूत्रांच्या उत्क्रांतीची? उत्क्रांती नंतरच्या जड्शीलतेची ? फांदीवरून गळून पडण्याची ? अलगद मातीवर उतरण्याची ? 

" ही अभिषेकाची वेळ आहे 
जगण्यातला 'धूळ - कचरा ', कळकट मळकट पणा टाकून देण्याची वेळ….  
संध्याकाळच्या यतीची वेळ… 
आरंभाची वेळ…। "

जीवनाचा आरंभ झाला आहे. एका जन्मात या पेक्षा अधिक काय मागावे ! ऋणी आहे मी आईची , त्या कुमारवेड्या मित्राची आणि कुमारांच्या या स्वर मायेची !!
 

Friday 28 March 2014


माफ्या मागवा हो
माफ्या मागवा हो
तिला तसं सोडू नका….
खड्ड्यात गाडून पायानं बुजवून घ्या छान
पण आधी माफीनामे भरून घ्या !
तिचे चुकार श्वास हात थोपवताहेत तुमचे ?
सवयी तिच्याच या घाणेरड्या
मोकळीक हवी तिला श्वासांची !
चेचा आधी श्वास , 
वेडे आहात का ? सोडू नका, गमावू नका....
कोंबा त्यांना तिच्या तडकलेल्या कुडीत
गेट लॉस्ट म्हणावं…
पण आधी माफ्या मागवून घ्या पुष्कळशा …
कितीक खिडक्या उघडल्या तिनं
उनाड पाखरांना घरात घेतलंय रात्रीचं
ऐकलंय की बरेच घासही भरवलेत पिल्लांना…
उन्हात उभ्यानं वाटा पाहिल्यात शिशिराच्या …
प्रेमंही केलीत म्हणे फार विझत्या मोसमांवर
सटासट माफीनामे भरून घ्या सगळ्या आरोपांसाठी
वेळ थोडाय…

मूर्ख शपथा घ्यायची ती भोळ्या भाबड्या पावसांच्या …
आणि उन्हाच्या एका कवडशापायी त्या मोडायची पण धडाधडा
काही मौल्यवान नाहीच तिच्या ठायी
काहीच नाही जपण्याजोगं, शोभण्याजोगं
नुसते फालतू व्याकूळ अधाशी अट्टाहास
मोरांच्या डोंगरावर जाऊन मोरांच्या वाड्ग्यातलं पाणी प्यावं म्हणे पहाटेला !
त्यानं युगानुयुगाची तहान भागते ?
हिला कसली आलीये तहान !
देशांचे- जमिनींचे इतिहास, युद्धे, धर्म, संस्कृत्या
कपडेलत्ते, वस्तू, रक्तरंजित क्रांत्या,
साहीत्य, तत्वज्ञान, उत्क्रांती, मनुष्यगाथा,
डावे उजवे, आतले बाहेरचे…
कशाचं भान हिला ? हाआआड !
आला दिवस नाचत बागडत
सिनेमे पाहत, भांडत कुंडत,
आमटी भात ओरपत, केर काढत
कट्टी बट्टी करीत…
उसनं उधळतच ,
जगलीस ना !
मग तू कसली बोट नाचवतेस ?
कुणाला काय मागतेस ?
माफी माग मूर्ख चिंधे …
साला व्हिस्कीची नशा नाश पावतेय….
माफीपत्र मागवा आधी भडवीकडून
कितीदा पाठवलीत, म्हणेल… तरी परत लिहून घ्या !
बोटं थंड पडलीत ? पडणारच.
कुठली आगच नाई नं बेंबीत…
असल्या बेम्ब्या गुवानं बुजवल्या पाहिजेत !
नाही नाही, परतू नका तसेच वांझोटे,
आता जुन्याच  इतिहासावर नव्यानं अंगठा लावून घ्या तिचा
आहे का उब थोडीशी ?
पुरतेय …

Monday 10 March 2014

ती एक पिनू - 'पिनू' उर्फ 'जियरा' साठी स्वागतगीत



ती एक पिनू 

'पिनू' उर्फ 'जियरा' साठी स्वागतगीत



ती एक पिनू … 

बासुरी रंगाची…. 
समुद्री निळाईची…. 
रेतीतल्या पाऱ्याची… 
हलकेच बिलगणाऱ्या 
मोसमी मायेची…. 

ती…. 
समेवरच्या घरातली… 
श्रुतींच्या देशातली …. 
स्वरांना बांधणाऱ्या 
आलापीच्या बांधावरली … 

ती…. एक पिनू 
सप्तकी बिंदूतली… 
मात्रांमात्रांतली… 
अबोधतेनं स्पर्शलेल्या 
स्वरांच्या लिपीतली…. 

ती…
हृदयांतली … 
युगानुयुगे आळवावी 
अशा लाडक्या बंदिशीतली… 

१० मार्च, २०१४ 

Tuesday 4 March 2014


एक चूक सूर्याची 
(बालांसाठी विज्ञानकथा)


सूर्यानं हातपाय ताणून चांगला आळस दिला. डोळे उघडून इकडे तिकडे पाहतो तर त्याच्या आभाळाच्या महालात गुडुप्प अंधार ! 
हे काय ? एवढा कसा अंधार आपल्या महालात ? …. अरे हो, आपण उठल्याशिवाय हा अंधार थोडाच जाणारे ? 

डोक्यावर हात मारत तो उठला. होताच तसा तो थोडासा विसराळू, अधून मधून छोट्या छोट्या चुका करणारा. पण बाकी आपल्या कामात  एकदम तरबेज ! प्रत्येक क्षणाला विश्वाला प्रकाश, उष्णता, ऊर्जा देण्याचं त्याचं काम बिनबोभाट चालू आहे. आहे कुणाची काही तक्रार ! 


सध्या तर त्याच्याकडे सृष्टी निर्माण करण्याचं फार महत्त्वाचं काम आहे. पाऊस, वारा, डोंगर, दऱ्या, झाडं, पानं, फुलं, पशु - पक्षी, नदया, समुद्र आणि आणखीही काय काय !! किती परिश्रमानं त्यानं ही सृष्टी रंगीबेरंगी फुलांपानांनी नटवली आहे. 

हळूच इकडे तिकडे पाहत चोर पावलांनी सूर्य महालाच्या दारात आला. दाराआडून गुपचूप बाहेर डोकावला. कुठं बरं लपली असतील ही बदमाश किरणं? सारखी आपली मागावरच असतात आपल्या. जरासुद्धा सुटका नाही त्यांच्यापासून. रात्री झोपण्याआधी त्यांना जबरदस्तीनं अंगावरून काढून ठेवलं तरी सगळीच्या सगळी महालाबाहेर पहारा देत लपून बसतात. सकाळ झाली की मारल्याच उद्या अंगावर बदाबद ! फार चिकट जात आहे बुवा ! काय करावं ? 

स्वतःशीच बारीक आवाजात पुटपुटत सूर्यानं दाराबाहेर पाऊल टाकलं आणि दाराआड लपलेल्या शेकडो किरणांनी दणादणा त्याच्या अंगावर उड्या ठोकल्या ! 

च्च… काय ताप आहे हा ! वर्षानुवर्षं या खराट्यांना घेऊन का बरं फिरायचं मी ? बिचारा केविलवाणा झाला. कारण रोजच्यासारखं त्याच्या अंगावर सर्वात आधी चिकटण्यासाठी किरणांचा कोण गोंधळ ! 

अखेर शेवटच्या एका बालकिरणाला अंगावर बसवून घेत ही वरात जेव्हा चालू लागली, तेव्हा सूर्याचं चिडणं हळूहळू वात्सल्यात बदललेलं होतं. " खरंच , का बरं रागावतो आपण आपल्या किरणांवर? किती माया करतात ही आपल्यावर, आणि या किरणांशिवाय मला कुणी सूर्य तरी म्हणेल का ?" सूर्य शांत हसला आणि विश्वाची सोनेरी पहाट झाली. 

त्याचं आगमन झाल्या झाल्या त्याच्या मागे हा मोठ्ठा गोतावळा. पाऊस, वारा, प्राणी, पक्षी सगळे आपली गार्हाणी मांडायला हजर ! सृष्टीची निर्मिती नुकतीच सुरु झाली होती. एवढ्या मोठ्या कामात कुठं नं कुठं, काही नं काही घोटाळा राहून जायचाच , नाही का? त्यातून प्रत्येकाला आपल्या आवडीचं काम देणंही किती मुश्किल ! 

पाऊस म्हणाला, " रविराजा, मी सरळच्या सरळ का बरं पडायचं ? मला छानसं, वळणा- वळणाचं, नागमोडी बनव ना तू. पृथ्वीवरचे ते नाग, साप किती वळसेदार आहेत बघ. मला पण सापांसारखं नागमोडी व्ह्यायचय." 

पाऊस अगदी हटूनच बसला. शेवटी सूर्यानं आपली किरणं त्याच्या अंगावरून फिरवली आणि पावसाच्या सरी नागमोडी होऊन बरसू लागल्या. 

वाराही वैतागला होता. म्हणाला, " भास्करा, नुसतंच इकडून तिकडून किती वाहायचं रे मी? त्या काळतोंड्या ढगांची राखण करायची, उनाड पावसाला वाहून न्यायचं , पृथ्वीचा केर काढायचा… ही कसली बाबा कंटाळवाणी कामं ? काहीतरी नाजुक, पुरतील अशी काम दे नां रे मला ! "

काय कामं  द्यावीत बरं या अवखळ वाऱ्याला ? कितीही कामं दिली तरी आपल्या अफाट वेगानं सगळी कामं तो चुटकीसरशी संपवून टाकतो. सूर्य विचारात पडला. 'थोड्या दिवसांनी मनासारखं काम देतो' असं सांगून त्यानं वाऱ्याची बोळवण केली.  

इतक्यात आभाळात दूरवर चाललेला कोलाहल सूर्यानं पाहिला. खूपसे पशू, पक्षी, नदी नाले, फुलं रडत ओरडत सूर्याकडे धावत येत होती. सूर्याजवळ आल्या आल्या नदी रडता रडता म्हणाली, " दिनकरा, वाचव रे बाबा आम्हांला ! तू आम्हांला सगळ्यांना जन्म दिलांस, पण या गर्विष्ठ डोंगर - पर्वतांना मात्र आम्हांला चिरडायला मोकळं सोडून दिलंस का ? पृथ्वीवर बघ, तुझे डोंगर- पर्वत कसे गर्वानं फिरताहेत सगळीकडे आणि त्यांच्या मोठ्ठ्या अंगांखाली सगळी झाडं, पशु पक्षी, तुझी लाडकी फुलं कशी चिरडली जाताहेत ! कसं जगावं सांग बरं आम्ही ? " 

" ऑ ? " सूर्याचे डोळे अविश्वासानं विस्फारले, " काय सांगतेस काय ? चल चल बघू बरं " 

त्यानं घाईघाईनं पृथ्वीवर डोकावलं, तर खरचंच त्यानं मोठ्या कौशल्यानं बनवलेल्या आल्प्स, सह्याद्री, काराकोरम अशा महाकाय पर्वतरांगा पृथ्वीवर मजेत फिरत होत्या , पण गर्वानं नाही तर अतिशय आनंदानं सृष्टी न्याहाळत, निसर्गाचं गुणगान करीत, हसत खेळत, गाणी गात ते भटकत होते. आपल्या अवाढव्य अंगांखाली ही नवीन सृष्टी चिरडली जातेय याची बिचार्यांना कल्पनापण नव्हती. आपल्याच मस्तीत सूर्याच्या स्तुतीची गाणी गात ते अजस्त्र पर्वत विहार करीत होते. 

चूक खरी सूर्याचीच होती ! त्यानंच तर त्यांच्या अगडबंब शरीरांना ' चालतं ' केलं होतं आणि पाहता पाहता त्याच्या एका चुकीमुळं नव्या नवेल्या सृष्टीची धूळधाण उडाली होती ! 

माझी फुलं चिरडली ? माझ्या रंगीबेरंगी सृष्टीचा नाश झाला ? सूर्याच्या तोंडून शब्द फुटेना. एवढी मोठी चूक ? माझ्या हातून ? स्वतःवरच चरफडत चिडत सूर्यानं आग पाखडली. त्याच्या डोळ्यांतून संतापानं ज्वाळा सांडू लागल्या. समोरचे प्राणीगण घाबरून थरथरू लागले. आता काय होणार या कल्पनेनं सृष्टी भयभीत झाली. 

" पर्वतांनो…. , जिथं आहात तिथंच थांबा " सूर्याची जळजळीत आज्ञा विश्वाच्या कानाकोपऱ्यात धडकली. " ज्या उन्मत्त गतीमुळे तुम्ही माझ्या लाडक्या सृष्टीला पायदळी तुडवलेत, ती गती या क्षणापासून मी तुमच्याकडून काढून घेत आहे. काढून घेत आहे तुमच्या अंगाखांद्यावर खेळणारं हे जीवन, ज्याचं भान न ठेवता भटकलात तुम्ही आणि चिरडलीत माझी फुलं… आता राहा असेच उघडे आणि बोडके, आयुष्यभर  !! हीच तुमची शिक्षा ! पण मी उद्या उगवेपर्यंत सगळी जमीन पुन्हा फुलांनी सजलेली दिसली नाही तर या विश्वातून तुम्ही कायमचे नामशेष झालातच म्हणून समजा, जा चालते व्हा आणि ताबडतोब कामाला लागा !!!" कडाडून आज्ञा देत सूर्य दाणदाण पाय आपटत तिथून चालता झाला. 

पर्वतांनी ही आज्ञा ऐकली, मात्र दुःखंवेगानं त्यांना मूर्च्छा आल्यागत झालं. ते जोरजोरानं रडू लागले. आपली गती नाहीशी होणार ? आपण कायमचे बोडके होणार ? नाही नाही. त्यांचा अवाढव्य जीव व्याकूळ झाला. आणि कामाला तरी काय लागणार कर्माचं ! बिचारे एका जागी खिळून ऊभेच आपले ! असहायपणे रडून रडून त्यांनी इतका कहर केला की पृथ्वीपुढे    महापुराचं नवीन संकट उभं राहिलं . पर्वतांचा तरी काय दोष होता ? चूक कुणाची आणि कुणा निरपराधांना केवढी मोठी शिक्षा मिळाली ! 

सृष्टीतल्या प्रत्येक जीवाचं मन व्याकूळ झालं. काही झालं तरी हे पर्वत त्यांचे सगेसोयरे, त्यांचे मित्रच होते नं! पर्वतांना संकटात एकटं सोडून देणं शक्यच नव्हतं कुणाला. 

वारा , नदी, पशू - पक्षी, कीडे, फुलपाखरं साऱ्यांनी विचार सुरु केला. काय करावं ?  तो क्षण मोठा अद्भुत होता, जेव्हा विश्वातला प्रत्येक घटक एक आणि एकच प्रश्न सोडवू पाहत होता. फुलांची दुनिया पुन्हा कशी फुलवावी ?

वाऱ्याची बुध्दी त्याच्यासारखीच तेज ! त्यानं युक्ती लढवली. 

उध्वस्त झालेल्या फुलांमधून वाऱ्यानं इवले इवले खूप सारे परागकण गोळा केले, त्यांना लांब लांब वाहून नेलं आणि विखरून टाकलं ओसाड पर्वतांवर, जमिनींवर. तिथं त्या परागकणांमधून नवीन फुलांनी जन्म घेतला. 

पाण्यानं आपल्याबरोबर कितीतरी परागकण वाहून दूर दूर नेले आणि विखरून टाकले आसपासच्या झाडाझुडूपांवर, शेतांमध्ये. तिथेही त्या परागकणांमधून नवीन फुलं जन्माला आली.  
  
फुलपाखरं, कीडे, मधमाशा, कीटक, पक्षी यांनी उंच उंच जागांवरचे वेगवेगळे परागकण उचलले आणि आपल्या पायांवर, पंखांवर, पिसांवर, मिशांवर त्यांना बसवून दूर दूर , उंच उंच जागांवर नेउन सोडले. त्यांनी जिथे जिथे परागकण टाकले, तिथे तिथे नवनवीन फुलं उमलू लागली. 

सूर्यानं सकाळी पाहिलं, तर सगळी सृष्टी फुलांबरोबर डोलत होती. तो समाधानानं हसला. पर्वत, झाडं झुडुपं, पशु पक्षी, कीडे - कीटक, वारा , पाणी सारे खुशीनं नाचत होते. वारा तर भलताच खुश होता.  त्याला आता त्याच्या मनासारखं अगदी नाजुकसं, कधीही न संपणारं विशेष काम मिळालं होतं ! 

आजही नित्यनेमानं वारा, पाणी, कीटक, पशु, पक्षी परागकणांची इवली इवली गाठोडी आपल्यासोबत दूर दूर वाहून नेत आहेत आणि सृष्टीला सजवत आहेत. तुम्हालाही कधी एखाद्या पहाटे तुमच्या उशीजवळ जर सापडलंच एखादं परागकणांचं गाठोडं, तर पोहोचतं कराल न ते तुमच्या बागेतल्या झाडाकडे ? पण हळूच हं, कदाचित त्या धुक्यातल्या पहाटे ती झाडं अगदी गाढ झोपेत असतील !




५ मार्च, २०१४ 

Friday 28 February 2014

आमचा सुहास काका (सुहास शिरवळकर)

२८  फेब्रुवारी , २०१४ 

आमचा सुहास काका 

सुहास काका आमचा सर्वांचा लाडका काका. कळत्या - नकळत्या वयात 'येणं' असो अथवा 'वयातून पार होणं ' असो, आम्ही शिरवळकरांची पोरंबाळं हटकून वाढवल्यासारखी सुहासकाकाच्या छायेतच वाढलो. लहानपणी मुंबई - कोकणातून भावंडांचे डेरे मे च्या सुट्टीसाठी पुण्याला आजोबांच्या वाड्यात येऊन दाखल व्हायचे. मग पहाटे पर्वती, दिवसभर मुक्त भटकंती, अखंड भांडणं, बेसुमार मस्ती , वेळी अवेळी कॉफी, पत्ते, कॅरम, क्रिकेट, गाणी आणि दमेपर्यंत रात्र रात्र गप्पा ! महिनाभर हाच उद्योग ! २०-२५ च्या संख्येनं कुठेही, कुठल्याही क्षणाला लगडणाऱ्या आमच्या छळवादी कंपूला फुलासारखं हाताळणारा एकमेव होता 'सुहास काका' ! 'सकाळपासून स्वच्छ मिश्किल हसत, मांड्यावर 'टपटप' करीत, दिसेल त्याच्या खोड्या काढत वावरणाऱ्या सुहासकाकाला पाहणं' म्हणजे पावसानंतर धूळ झडलेलं बहाव्याचं प्रकाशमान झाड पाहिल्यासारखं वाटायचं. काका जिथे असेल तिथे आभाळाएवढे हशे, टाळ्या आणि खळखळाट. कुणीच त्याच्या प्रभावापासून दूर राहू शकायचं नाही. भाषा, प्रदेश, समाज, वय, प्रतिष्ठा, व्यवसाय…कुठलीच कुंपणं त्याच्या कधी आड येऊ शकली नाहीत. तो सर्वांपर्यंत आणि सर्व त्याच्यापर्यंत पोहोचत राहिली… विनासायास.

भाषेवर त्याचं उत्तम प्रभुत्व. ती वाकवून, मुरडून हवी तशी वापरण्याची हातोटी होती त्याच्यापाशी. बेफाम लोकसंग्रह, कुठेही केंद्रस्थानी ठेवणारी अद्भुत विनोदबुद्धी, कुठल्याही अनुभवाला भिडायची लख्ख तयारी अणि इवल्या इवल्या गोष्टींवरही तुटून प्रेम करण्याची आत्मशक्ती ! सुहासकाका एक विशेष रसायन होतं. हे खेळकर  रसायन लहानपणापासूनच आमच्या अंगात भिनत गेलं आणि त्याच्या छटा वाढत्या  श्रेणीनं आयुष्यात रंगत आणत गेल्या. शाळा- कॉलेजात असताना काकाची ओळख सांगितल्यावर "ओ हो !!! ते तुमचे काका का ? " असा मनोहर मुग्ध विस्फार आमच्या सर्वांच्याच परिचयाचा असायचा. माणसं भारावून बोलायची. मला तेव्हा त्याच्या या लोकप्रियतेची मजा वाटायची. लोकांचं लेखकाला असं परमेश्वर स्थानी मानणं, त्याच्याबद्दल भरभरून बोलणं, त्याची पूजा करणं, त्याच्यासाठी रडणं वगैरे मला 'वहावणं' वाटायचं. मी काकाच्या पुस्तकांबद्दल पारायणवादी होतेच, पण मला वाहवणं जमायचं नाही. कुणाच्याच बाबतीत नाही जमायचं. मात्र काकाकडे पुण्याला शिकण्यासाठी आले, त्याला खूप जवळून बघितलं आणि काकाच्या या बिनतोड़ लोकप्रियतेचं गणित मला सहज उलगडलं !

लहानपणी गणित सोडवताना कित्येकदा निःशेष भागाकार मिळावा म्हणून "हातचा एक" घ्यावा लागायचा. हा "हातचा एक" म्हंजे काय ? कोण ? कुठून येतो? कसा येतो ? कशासाठी येतो याचं मला नेहमीच कोडं पडायचं. पण तो "हातचा " सगळं गणित सोपं करून जायचा. थांबलेली प्रक्रिया पुढे सरकायची आणि गणित उत्तरापर्यंत जाऊन पोहोचायचं. काका अनेकांच्या आयुष्यातला असा "हातचा एक" होता. तो सहजी त्यांच्या थांबलेल्या गणितात सामावून जायचा आणि माणसांची गणितं उत्तरापर्यंत पुढे सरकायची. " तो आहे " या एका विश्वासावर, त्याला प्रत्यक्ष न भेटता देखील त्याच्या लेखनातल्या अदृश्य जीवनशक्तीतून अनेक आयुष्यं मार्गस्थ झाली. त्याचा हात ममतेनं पाठीवरून फिरला आणि आत्महत्येच्या दोराला शिवून आलेले कोवळे दुर्दैवी जीव आयुष्यं पेलायला पुन्हा सज्ज झाले. मी हे सगळं खूप जवळून पाहिलं आणि सुहासकाकाच्या समाजमान्यतेचं कोडं मला अलगद उलगडलं. समाजांच्या इतिहासात याची नोंद आढळणं सर्वस्वी अशक्य आहे, पण कुटुंबांच्या, पिढ्यांच्या इतिहासात त्याच्या या अमोल सहभागाची मोजदाद खात्रीनं होईल हे मी जाणून आहे. 

काकाच्या सान्निध्यात आमचं बालपण खऱ्या निर्भेळ्तेनं मोठं झालं. वेदना मागे ठेऊन जगण्याची मजा घ्यायला आम्ही शिकलो. परिस्थितीकडे डोळस संवेदनेनं पाहत इच्छा, आकांक्षा, वासना यांचे ताणतणाव स्वच्छ प्रामाणिकपणे झेलू लागलो. बागांतली तजेलदार रंगबिरंगी फुलं मिळूनही रस्त्यावरच्या सूर्यप्रकाशात अखंड निथळणारा हा बहावा आम्हाला पदोपदी खिळवत राहिला. 

शनिवारातल्या माझ्या छोट्याशा हॉटेलवर काका दिवसांतून दोन तीनदा तरी यायचाच. झणझणीत मिसळ खाताना प्रदीप्त चेहऱ्यानं "आहा…मजा आली" असा त्याचा कौतुकाचा उद् गार मला मोहरवून जायचा. त्याचं ते आवर्जून "आस्वाद "ला येणं, आवडते पदार्थ त्यांच्या प्रेमात डुबून डुबून खाणं मला भयंकर आवडायचं. मग कॉफी , गप्पा, हशा, अश्लील जोक्स सुद्धा. त्याच्या येण्यानं दिवसभराचा थकवा गायब व्हायचा. एवढी जीवनशक्ती हा माणूस रोज कुठून आणायचा ?   

त्याच शक्तीनिशी विनातक्रार तो मृत्युसमोर उभा राहिला. क्षणाचाही विलंब न करता आपली श्वासांची कडी सोडवून घेतली आणि पसार झाला. त्याच्या अकाली जाण्यानं आमच्या आयुष्यात पोकळी नाही निर्माण झाली. लाकूड चिरफळावं तशी आमची जगणीं दोन भागांत चिरफाळली गेली…. एक त्याच्या सह…एक त्याच्याविना… !!